Monday, 11 December 2017

घडलो’बि’घडलो-१


 लहानपणी आम्ही सर्व भावंड आईसोबत कधी नातेवाईकांकडे तर कधी स्नेहींकडे जायचो. यातील अनेकजण आमच्या पेक्षा बऱ्यापैकी पैसे बाळगून होते, घरून निघतानाच आई सांगायची-“ बाळांनो, तिकडे कोणत्याही वस्तूला हात लावायचा नाही, काहीही मागायचं नाही, बदाम पिस्ते काजू हे सर्व खूप महाग असतं. ते सर्व पदार्थ सजवण्यासाठी वापरतात. पौष्टिकता तर आहेच...हं,  तर काय सांगतेय ऐकताय ना रे...! ती घराणं मोठी त्यांच्या मुलांनी हळूच ताटलीत हात घालून काही खाल्ले म्हणून तुम्ही हात घालाल, तसं करू नका. अरे, श्रीमंतांची गोष्ट वेगळी असते, त्यांनी काही खाल्लं तर आवडतं म्हणून खाल्लं असं म्हणतील, गरीबानं मात्र भूक लागली  म्हणून लपवून खाल्लं असं टोचत राहतील, नीट वागा हं.” आईची उदाहरणं, म्हणी लय भारी असायच्या, पण या संस्कारांमुळे घरा बाहेर कुठंही गेलो तर, पहिलं वाढलेलं तेवढंच खाण्याची सवयच जडली. कुणाकडेही कधीच न मागण्याच्या या सवयीमुळे त्याचे परिणाम जे व्हायचे ते होतातही. पण समाधान मोठं. 
मात्र, अशातही फक्त एक भूक कळत्या वयापासून कायम वाढत गेली, ती आवडीनं जोपासली, ती म्हणजे ज्ञानाची भूक. नवनवीन माहिती जाणून घ्यायची, प्रयत्न करायचे. कित्तेकदा त्यासाठी रद्दीतली पुस्तकं उचलून आणली, तर काहींची ओझीही वाहिली.दिवस पुढेपुढे सरकत गेले. 
काळ कुणासाठी थांबत नसतोच. आता घरोघरी एक किंवा दोन मुलं, त्यांच्या गरजा वेगवेगळ्या, अलिकडं मुलांचंही कुणाकडं जाणं येणं नाही.  ती आपल्या विश्वात जास्त रमतात. नाती असो वा स्नेही किंवा मैत्री सारंच कसं अलिकडं सोशल मिडियाच्या माध्यमतून जपलं जातं. घरात बदाम पिस्त्याच्या बरण्या ओसंडून वाहतात, ते संपवावे म्हणून त्याचे लाडू केले, तरी दोन दिवस बळेबळे खाल्ले जातात, मग आठच दिवसात ते घरा बाहेर पडतात...कधी कामकरणाऱ्या बाईच्या घरात, तर कधी कचरा घेऊन जाणाऱ्याच्या हातात...संदर्भ बदलले की नकळत होणाऱ्या संस्कारांचे मुल्यही बदलत जातं. आपण मात्र विचार करत राहतो...कमी पैशातही तेव्हा घरात सुख समाधान नांदत होतं, चेहऱ्यावर झळकत होतं. मागणं हे कमीपणाचं लक्षण होतं. आता संपूर्ण समाजाचीच जडण घडण बदलली. नात्यांचे बंध विरळ होत गेले अन् मागण्याचे संदर्भही बदलले!
- सुमेधा

No comments:

Post a Comment