अंतरीचे तरंग

'उत्पत्ती-स्थिति-लय' यही सत्य है। विश्व का एक भी क्षेत्र इसे परे नही है।

Thursday, 20 April 2017

मन वढाय वढाय-4 जनशक्तीमधील स्तंभ-

                                                  || देव मस्तकी धरावा| अवघा हलकल्लोळ करावा ||

    सर्व शक्तीमान असे जे या विश्वाच्या निर्मितीचे कारण आहे. जी दिव्य शक्ती, ज्याच्या कृपेने या जगात आलो, ज्याची अवघ्या चराचरावर सत्ता आहे. जो सर्वव्यापी आहे, आपण त्यालाच विसरत चाललोय का? कोणी घासभर तुकडा दिला तर आपण त्यांचे आभार मानतो, त्यांच्या समोर मान खाली घालून वारंवार कृतज्ञता व्यक्त करतो मग ज्याने जन्म दिला आणि लगेचच जीवाला वाढवण्यासाठी लागणारे सर्व काही मुक्त हस्ते देत राहिला त्यालाच नाकारू लागलोय. ज्याने अमर्याद पृथ्वी दिली, ज्याने असीम आकाश दिले, दशदिशा दिल्या, उन्ह-पाऊस दिलं, पिंके आणि शेती दिली, जो अविरत कृपाच बरसत राहिलाय आपण त्याचे अस्तित्वच मान्य करण्यासाठी कोतेपणा दाखवत आहोत का?

   विज्ञानवाद म्हणा वा आधुनिक जग म्हणा इथं आपण सर्व सत्वहीन आणि टाकाऊ गोष्टींना प्रथम स्थान देऊन स्वत:च्या प्रगतीच्या आड उभे रहात आहोत. जसं नव्या उत्पादनाची सतत जाहिरात करून तीच कशी फायदेशीर आहे, हे मनावर बिंबवले जाते. व्यापक प्रमाणात जे समोर येते तेच खरे मानून त्याच्या खरेदीसाठी झुंबड होते. लोक भावनेचा अभ्यास आणि मार्केटिंगचे नवे फंडे त्या त्या उत्पादनाच्या अधिक खपासाठी वापरले जातात. मग त्याच्या उपयोगितेवर आणि टिकाऊ मुल्यांवर प्रश्नच उठवले जात नाहीत. जेव्हा त्यातील फोलपणा उघड होतो तेव्हा बराचकाळ गेलेला असतो. कमी अधिक फरकाने आपणही अनेकदा जिनवातील अत्यंत आवश्यक गोष्टींची अवहेलना करतोय, कारण जे समोर दिसत नाही पण जे आहे, ते नाकारतो. याचं एक कारण आज समाजात चांगल्या गोष्टी शिकवल्याच जात नाही हे असावे. चांगले विचार हवे असतात, पण स्वार्थाची सरमिसळ झाल्यानं सर्वव्यापी हिताची व्याख्याच नष्ट होत आहे. केवळ ‘स्व’ मध्येच गुंतल्यानं अनेक प्रश्न निर्माण होताहेत. या विश्वाचाच एक भाग होऊन उभे राहून कार्य करणारी एक शक्ती आहे, जी रहस्यमय आहे. तिचे रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न करणे म्हणजे तिच्या जवळ जाण्याची आस असणे, त्यावर विश्वास ठेवूनच, मार्ग कोणताही स्वीकारा पण तिला शरण जाऊन तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करूनच ते थोडे तरी ओळखता येणे शक्य आहे. असा प्रयत्न आपल्या ऋषी मुनींनी केला. त्यांना जे ज्ञान प्राप्त झाले ते त्यांनी वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये मांडले.  आजही कित्तेक दुर्गम-निर्जन स्थळी असे महात्मे निश्चित असतील जे त्या असीम शक्तीच्या जवळ जाऊन तिला जाणण्याचा प्रयत्न करताहेत. आपण भौतिक सुखात एवढे गुरफटलोय कि अशी दिव्य शक्ती आपल्यात आहे, आपले असणे म्हणजेच तिचे असणे आहे, हेच स्वीकारत नाही. याचं एक कारण माणसा मधील वाढलेला अहंकार हे ही असेल. ‘मी’ चं अस्तित्व जास्त ग्राह्य धरल्यानं आज समाजात वरकरणी म्हणवणारी प्रगती आपण केली हा दावा आहे. पण त्यातही फारसं तथ्य नाहीच. कारण आपण नैसर्गिक संकटं अनुभवलीत हे संकेत आहेत त्या असीम शक्तीचे जी सावध करते मानवाला, की तुझा अहंकार व्यर्थ आहे. तू जे करतोयस ते मीच करू देतोय. अन्यथा तू निपचित पडून राहशील. मात्र, हे इशारे आपल्याला समजत नाहीत. अनेक विकल्प मनाशी कवटाळत आपण त्याच्यावर शंका घेतो आणि जो या विश्वाचा कर्ता, जो म्हणजेच विश्व हे नाकारून त्याला वेगळे काढण्याचा प्रयत्न करतो. इथंच तर माणूस फसतो. इथं आठवतो तो ‘ईशोपनिषत्’ मधील शांती मंत्र -

ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पुर्णमुदच्यते
 पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॥
 ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः |

    ते पूर्ण आहे, हे पूर्ण आहे. पूर्णापासून पूर्ण उत्पन्न होते. पूर्णाचे पूर्ण काढून घेतल्यानंतरही पूर्णच शिल्लक राहते. याचे संदर्भ स्पष्ट करताना डॉ. प वि वर्तकांची मांडणी अशी – “पूर्णातून पूर्ण बाहेर काढले तर पूर्णच शिल्लक राहणार. ब्रह्माही पूर्ण आहे आणि आत्माही पूर्णच आहे. तेव्हा शिल्लक जे काय राहिल ते ही पूर्णच असेल. ब्रह्म पूर्ण आहे, सर्व व्यापक आहे, अमर्याद आहे, त्यातून कोणतीही वस्तू बाहेर काढणे शक्य नाही आणि जे बाहेर काढाल किंवा बाहेर काढणारेही त्या ब्रह्मातच राहणार आहेत. मग कशातून बाहेर काढून काय बाहेर ठेवणार आणि कुठे ठेवणार सर्वच तर त्याने व्यापलेले त्याचेच आहे.” म्हणजेच त्या असीम शक्तीच्या हाती सर्वच एकवटलेले आहे. ना तो वेगळा ना आपण वेगळे ना विश्वातील कोणतीच वस्तू वेगळी. मग हा व्यर्थ अहंकार कशासाठी ? का त्याला शरण जाण्यात एवढा कमीपणा बाळगतो. कोणत्या कर्माच्या एवढ्या राशी निर्माण करून गाठोडे जड करतोय जे अंतिमत: पलिकडच्या दालनात जाताना अडचण निर्माण करेल. त्यामुळे शरणांत होऊऩ सर्व त्याच्या स्वाधीन करून अमृताची फळं चाखणं जास्त हितकारक नव्हे काय!

Posted by sumedha upadhye at 02:55 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Thursday, 13 April 2017

जनशक्तिमधील स्तंभ-
      3 – मन वढाय वढाय...
                         ...हवी मनाची मशागत
खोटी प्रतिष्ठा, पुरूषी अहंकार आणि असुरक्षितता अशा विविध कारणाने आज समाजात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. आजही पुरोगामी महाराष्ट्रात आंतरजातीय विवाह मान्य नाही, त्यातून राग इतका वाढतो की बापच मुलीची हत्या करतो. लागोपाठ मुलगीच जन्माला आली तर जन्मल्यानंतर किंवा गर्भातच नाजूक कळ्या चुरगळून टाकतो, एखाद्या मुलीने नकार दिला की लगेच पुरूषी अहंकाराला ठेच पोहचते आणि त्या मुलीवर बलात्कार तरी होतो किंवा तिच्यावर जीव घेणे हल्ले होतात. दुस-याचा जीव घेणे शक्य झाले नाही तर मग स्वत: आत्महत्येचा मार्ग स्वीकारायचा... या सर्वांच्या मागे हिंसक प्रवृत्ती आणि असुरक्षितता कार्यरत असते...हे सर्व कोणत्या मानसिकतेतून येतंय ? यामागे नेमके काय घडतेय की माणसंच माणसाच्या जीवावर उठताहेत? हे सर्व प्रश्न अनाकलनिय असले तरीही याची उत्तरं माणसांच्या मनातला कोलाहल हेच असावं. आज पर्यंत घरातून आणि समाजातून झालेले संस्कार आणि त्यातून पुढे आलेल्या अपेक्षा तर कधी अतिमहत्वकांक्षा यांचा परिणाम होऊन आपण मानवी हक्कच पायदळी तुडवत चाललोय.

 अशा घटना घडतात त्यांना प्रवृत्त करते ते म्हणजे माणसाचे कमकुवत मन. आपण शिक्षण घेतोय, सुशिक्षित म्हणवतोय, विविध क्षेत्रात प्रगती करतोय. पण आता तपासून पाहिलं पाहिजे की खरंच आपण सुशिक्षित होतोय म्हणजे नेमके काय? केवळ पुस्तकी पाठांतराने पदव्या मिळवल्या म्हणजे सुशिक्षित का? आपण सुसंस्कारीत होणे महत्त्वाचे आहे. ज्या अभ्यासाने, ज्या संस्काराने मनाची मशागत होईल ते शिक्षण आवश्यक आहे. अहंकार, प्रतिष्ठा यांच्या ओझ्याखाली आपण दुस-याचे सुंदर जीवन उध्वस्त करीत आहोत. याचे भान ठेवावे लागेल. जिथे शिक्षणाचा अभाव आहे, तिथंही असाच संताप तुमच्या सद्सद् विवेकाचाच गळा घोटत असतो. इथं त्या व्यक्तिचे कृत्य आणि त्याचा अंतरात्मा यांच्यातही द्वंद्वंच निर्माण होतं. कारण राग शांत झाला की लक्षात येतं आपल्या हातून अनर्थ घडला आहे.
कित्येकदा अंतर्मनाचा आवाज हा नेहमीच सत्य सांगत असतो ते प्रारब्ध असेल किंवा देव म्हणा आणि त्याचं न ऐकता जेव्हा कृती होते तेव्हा अहित निश्चित असतं. आत्मा सुंदर आहे, त्याला तर परमात्म्यात विलिन व्हायची आस असते, पण त्याचं न ऐकता मानवी मन बाह्य जगात स्वत:ला काहि तरी करून सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो ते जेव्हा साध्य होत नाही तेव्हा त्याचे कमकुवत मन अविचाराच्या आहारी जाते आणि मग त्यांच्या हातून मानवी संस्कृतिला काळीमा फासणारी घटना घडून जाते. माणसाच्या प्रत्येक कृत्यात मन अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतं. मन जेव्हा उदास होतं आणि जेव्हा ते नकारात्मक विचारांचीच उजळणी करू लागतं तेव्हा त्याचा पगडा इतका मोठा असतो की ते आपल्या बुद्धिचाही ताबा घेतं. मना पुढे बुद्धिने शस्त्र खाली टाकली की त्यातून जे कृत्य घडतं त्यात स्वत:चं, दुस-याचं आणि कधी कधी व्यापक प्रमाणात समाजाचंही अहित होतं. या सर्वात वाईट कुणीच नाही, तर परिस्थिती वाईट असते असं म्हटलं जातं. वर्षानुवर्ष मनावर जे संस्कार झाले आहेत, ते जोपर्यंत पुसले जात नाहीत. तसंच मानसिक आरोग्याचा प्रश्न व्यापकपणे चर्चेत येत नाही, तोपर्यंत त्यावर सुसंस्कार करण्याचे प्रयत्न निष्फळ ठरतील. सशक्त मनाच्या हातून कधीही विघातक कृत्य घडू शकत नाही. आपल्याकडे मनाची मशागत करण्यासंदर्भात वेदकाळापासून कित्येक गोष्टी सांगितलेल्या आहे. मनाला संस्कारांचा लगाम घातला तर ते सैरवैर धावणे सोडून देते. मन स्थिर करण्यासाठी योग साधना प्रभावी आहे. प्राणायामाचं मह्त्त्व तर जागोजागी स्पष्ट केलेलं आहे. मात्र, आपल्याकडे आपल्या संस्कृतितल्या कित्येक चांगल्या व्यापक हिताच्या गोष्टी नाकारण्याची फॅशन आहे, ती दूर सारून घर, शाळा आणि समाज यात मनाच्या मशागतीवर भर दिला तर कित्येक सामाजिक प्रश्न सहज सोडवणं शक्य आहे. त्यातून असुरक्षिततेची भावना नष्ट होईल, सत्याच्या जवळ जाण्याची सवय होईल, मनामनात मानवतेचा विचार अंकुरेल आणि सर्वांचेच जीवन सुंदर होईल.
Posted by sumedha upadhye at 08:08 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Newer Posts Older Posts Home
Subscribe to: Comments (Atom)

About Me

sumedha upadhye
View my complete profile

Blog Archive

  • ►  2023 (1)
    • ►  November (1)
  • ►  2018 (2)
    • ►  January (2)
  • ▼  2017 (7)
    • ►  December (2)
    • ▼  April (2)
      • मन वढाय वढाय-4 जनशक्तीमधील स्तंभ-                ...
    • ►  March (3)
Simple theme. Theme images by luoman. Powered by Blogger.